बालाजी सुरवसे | उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांना देखील 50 आमदार सोडून गेले होते. पण, ते खचले नाहीत, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तुम्ही काही घाबरू नका, असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी अनेक चढ-उतार बघितले आहेत. मी राजकीय जीवनात नव्हतो. तेव्हा 55 आमदार निवडून आले होते. त्यातील पाचचं आमदार शरद पवार यांच्याकडे राहीले व 50 निघून गेले होते. कारण जे आहे ते आहे. परंतु, शरद पवार काही खचले नाहीत. ते म्हणाले जाऊ द्या. गेले ते गेले. पुन्हा त्यापेक्षा जास्त आमदार शरद पवारांनी निवडून आणले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी काही घाबरू नका. गद्दारी लोकांना आवडत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यात मोठी उलथा-पालथ झाली. यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले व उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली. व सर्वांनाच धक्का देत मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना वन शिंदे गट आमने-सामने आले असून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तर, आता शिंदे गचाने शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा दाखवत दसरा मेळाव्यावरही हक्क दाखविला आहे. यामुळे एकाच दिवशी शिवसेनेचे दोन दसरा मेळावा पार पडणार असून दोन्ही गट शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.