गोपी व्यास | मुंबई : शिवसेना गट प्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदार भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधल्यावरून निशाणा साधला होता. यावर आता भावना गावळींनी प्रत्युत्तर दिले आहे. कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज बाई झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भावना गवळी म्हणाल्या की, कालपर्यंत मी त्यांची ताई होते. आज बाई झाले. रक्षा बंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करू नये. मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदार संघातील एक लाखांपेक्षा जास्त बांधवाना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली, उद्धव साहेब नैराश्यातून असे विधानं करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?
मला पंतप्रधानांचं आश्चर्य वाटतं. स्वतःच्याच पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. तुम्हाला या सव्वा दीड कोटी लोकसंख्येमध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला. भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर निदान खरं खोटं काय ते बघून घ्या, भाजप ने काय माणसं धुवायची लॉंड्री काढली आहे काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाषणात केला होता.