आज राजकीय वर्तुळात खळबळ माजवून देणारे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे केलेल्या शपथविधीवर आज फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर एकच राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच आम्ही विद्यमान विरोधी पक्षनेता अजित पवार यांना सोबत घेऊन सरकारची स्थापना केली होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. त्यावरच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना हा साक्षात्कार निवडणुकीच्याच तोंडावर कसा होता, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते मुरब्बी राजकारणी आहेत. शरद पवार असे कधीही करणार नाहीत. ते जी भूमिका घेतात ती खुलेआम घेतात. लपून छपून राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणे हाच फडणवीसांच्या विधानाचा हेतू आहे.
काय दिली होती शरद पवारांनी प्रतिक्रिया?
2019ला झालेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीस यांनी मोठे विधान केले. त्यावर माध्यमांकडून शरद पवारांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे. सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते अशाप्रकारचं स्टेटमेंट करतील असं मला कधी वाटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावर दिली.