पुणे : उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. हा एकनाथ शिंदेंचा मोठा विजय मानण्यात येत आहे. यामुळे शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना संपली आहे. आता उद्धव ठाकरेंचं नाव घेऊ नका, कोण तो उद्धव? एकनाथ, देवेंद्र, नरेंद्र यांची नावे घ्या, असे त्यांनी म्हंटले आहे.
आजच्या चांगल्या दिवशी उद्धव ठाकरेंचं नाव घेऊ नका, कोण तो उद्धव? एकनाथ, देवेंद्र, नरेंद्र यांची नावे घ्या. उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे, त्याची अशी अवस्था होणारच होती. शिवसेना फुटणार असे मी पूर्वी पासून म्हणत होतो. कारण माझा अभ्यास आहे गेली 40 वर्षे मी सेनेत होतो. शिवसेनेत माझी जी अवस्था झाली तीच एकनाथ शिंदे यांची झाली होती. मी योग्य वेळी शिवसेना सोडली कारण मला उद्धव ठाकरे यांचा नेतृत्व मान्य नव्हते. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक म्हणजे त्यांच्या कुटुंबियांतील त्यांचे सदस्य आहेत, असा टोलाही नारायणा राणे यांनी लगावला आहे.
भाजपमध्येही मराठी आणि हिंदू माणसे आहेत. त्यांचा आम्हाला कधीच त्रास झालेला नाही. 2024 च्या निवडणुकीत सगळे आमदार हे भाजप आणि शिंदे गटाचे होणार असल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.