राज्यात सध्या प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहे. त्यातच दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे. हे सर्व सुरु असताना शिवसेना (ठाकरे गट) आणि (शिंदे गट) यांच्यात देखील प्रचंड वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना(ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले कदम?
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेचा सत्यानाश, शिवसेना फोडण्याचं पाप आणि उद्धव ठाकरेंना चुकीचे सल्ले देण्याचं पाप अनिल परबांनी केलं आहे. अनिल परबांमुळेच सगळी शिवसेना फुटली आहे. हे सगळं पाप त्यांचं आहे. दिवस बदलत असतात म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं. माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. जो मला त्रास दिला आहे तो मरेपर्यंत मी कदापि विसरणार नाही. हेच माझं म्हणणं आहे की होय दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय, अनुभवताय. मी हेदेखील सांगतो की या ४० आमदारांपैकी एकही आमदार पडणार नाही. असे विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांचं जे सुरू आहे ना खोके-खोके, गद्दार-गद्दार, कुणी केली गद्दारी? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी आणि गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केले आहे. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.