राजकारण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होणार? राजभवनाने दिले स्पष्टीकरण

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. विरोधकांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. अशातच शिवसेनेसह संभाजी राजे यांनी आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकाराला राज्यापालांविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समजत होती. मात्र, यावर राजभवनाने हे वृत्त फेटाळले आहे.

महाराष्ट्रात आता तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरींपर्यंत हिरो इथेच मिळतील, असे विधान राज्यपालांनी केले होते. या विधानावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षाकडून राज्यपालांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. तर, राज्यभरातून राज्यपालांविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. शिवसेनेकडून सामना संपादकीयमधून सातत्याने राज्यपाल कोश्यारींवर हल्ला चढविला जात आहेत. तर, उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे.

यासोबतच, राज्यपालांवर जर कोणतीही कारवाई होणार नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस व राज्यपाल कोश्यारी दिल्लीवारी केल्याचे वृत्त होते. यावरुन राज्यपालांची बदली होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी पदमुक्त होण्याचे संकेत दिल्याचे समजत होते.

महाराष्ट्रातील वाढता रोष पाहून केंद्र सरकारकडून राज्यपाल यांची बदली होऊ शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ही बदली होणे म्हणजे राज्यपालांवरील कारवाई करण्यात आली, असे संकेत जाऊ नये म्हणून राज्यपाल स्वतःच राष्ट्रपतींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करणार आहे. यासाठी आपल्या पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राज्यपालांना राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल, अशी माहिती होती. परंतु, ही माहिती अफवा असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पाठराखण केली आहे. राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढण्यात आले आहेत. पण राज्यपालांच्यादेखील मनात असे कुठलेही भाव नाहीयत. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही, असे फडणवीसांनी म्हंटले होते. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे धनी बनत आहेत.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी