आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. शांततेत बंद सुरू असताना अचानकपणे जमाव आक्रमक झाला. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर, काही ठिकाणी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांच ट्विट
परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध.
परभणीत काय घडलं?
परभणीत एका माथेफिरूने संविधान पुस्तकाचा अपमान केल्याने आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आणि तीव्र विरोध प्रदर्शन सुरू केले. शेकडो आंबेडकरी अनुयायी रेल्वे रुळावर जमा झाले आणि त्यानंतर आंदोलकांनी नंदिग्राम एक्सप्रेस रोखली. या आंदोलनाद्वारे ते संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत होते. माथेफिरूवर कारवाई होईपर्यंत आंदोलकांनी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला, ज्यामुळे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.