वाद पेटला! राणांच्या धमकीनंतर बच्चू कडूंनी गाठली मुंबई; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची घेणार भेट?
सूरज दहाट | अमरावती : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद मोठ्या गोंधळानंतर शांत झाला होता. परंतु, रवी राणा यांनी पुन्हा एकदा डिवचले आहे. यामुळे बच्चू कडू संतापले असून थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी मुंबई गाठवल्याचे समोर येत आहे. यामुळे राणा-कडू वाद शांत करण्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यश येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रहारच्या मेळाव्यात बच्चू कडू यांनी रावी राणासोबतचा वाद संपल्याचे जाहिर केले होते. परंतु, त्यानंतर रवी राणा यांनी कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे वादाची नवी ठिणगी पडली असून बच्चू कडू यांनी राणांना प्रत्युत्तरही दिले आहे. परंतु, आता बच्चू कडू चांगलेच नाराज झाल्याचे दिसले असून त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. कडूंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. व यानंतर बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर, कार्यकर्त्यांनी या वादावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशी सूचनाही बच्चू कडूंनी केली आहे. यामुळे भेटीत वाद मिटणार का चिघळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
काय आहे बच्चू कडू व रवी राणा यांच्यामधील वाद?
किराणा वाटपावरुन बच्चू कडूंनी रवी राणांवर टीका केली होती. यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन कोट्यवधीचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. यानंतर बच्चू कडू चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत राणांविरूध्द तक्रार नोंदवली होती. अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. यानंतर रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. तर बच्चू कडूंनीही वाद संपल्याचे जाहीर केले होते.
परंतु, रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंना डिवचले. एक लक्षात ठेवा, कुणी जर मला दम देत असेल. तर रवी राणाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दम खालला नाही. बच्चू कडू तर काहीच नाही. ते दम देऊन बोलत बोलत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची देखील हिंमत आहे, असा इशारा रवी राणांनी कडूंना दिला होता. यावर बच्चू कडूंनी प्रत्युत्तर देत म्हणाले, मी 5,6,7 या तारखेला माझ्या गावी कुरळपुर्णाला आहे. रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी हातात फुल घेऊन तयार आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.