राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी बंड केल्याने फुट पडली आहे. त्यांचं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेलं असून याप्रकरणी काल सुनावणी झाली. या सुनावणीत शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
आव्हाड म्हणाले की, कालच्या एक मुद्द्याने माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी विश्वास ठेवायचो यांचे दैवत पवार साहेब आहेत. मात्र, काल त्यांचा वकील म्हणाला शरद पवार हे संस्था सारखे पक्ष चालवतात आणि ते कधीही पक्षामध्ये लोकशाही मार्गाने वागले नाहीत. कालपर्यंत जे साहेबांना विठ्ठल म्हणत होते त्यांना माझा प्रश्न आहे की, काल तुम्ही साहेबांना वकील मार्फत हुकूमशहा म्हणालात. साहेब स्वतः दोन तास निवडणुक आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून होते, ते बोलून दाखवत नाहीत पण त्यांनाही भावनिक हल्ला झाल्यासारखं वाटलं. ज्या माणसाने आयुष्यभर लोकशाही मुल्यांचा आदर केला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक तासही ते त्या घरात कधी राहिले नाहीत. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचं काय फळ मिळालं, तर ते हुकूमशाह आहेत? महाराष्ट्रातील एका व्यक्तीला तरी हे पटतंय का सांगा, असा सवाल आव्हाड यांनी केला.
त्यांच्या हातातले बाळ आता वाढत होते म्हणून, उपटून फेकले. इतके, असंवनशील होणं चुकीचे. तुम्ही, शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या दारात नेले आहे. पुढे, काय घडेल आणि काय नाही हे निवडणूक आयोग यांच्या समोर होणारी सूनावणी आहे. आता प्रश्न संवेदनशीतेचा आहे. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.