आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली अशी चर्चा सुरु होती. त्याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत बोलताना मला माझ्या राज्यात परत जायचे म्हणतात, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यावरच उत्तर देताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. अशा प्रकारे बोलून ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत. अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यपालांना परत जायचं आहे, याबाबतीत ते माझ्याशी बोलले, अशा प्रकारे अजित पवार यांनी बोलू नये. त्यांची आणि राज्यपालांची भेट नेमकी कधी झाली. हे त्यांनी आधी सांगावे. राज्यपालांबाबत असं खोटं बोलणं योग्य नाही. अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. अशा प्रकारे बोलून ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत. त्यांनी उंचीचा विचार करून आणि भान ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला बावनकुळेंनी अजित पवारांना दिला.
पुढे ते म्हणाले की, राज्यपाल महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच काम सुरू केलं होते, हे त्यांनी अनेकदा त्यांच्या वागण्यातून दाखवून दिले आहे. स्वत: ते शिवनेरी गडावर जाऊन आले, त्यांनी अनेकदा शिवजयंतीच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यामुळे एका विधानावरून त्यांच्या वयावर त्यांच्या, वृद्धावस्थेवर बोलण्यात आले, हे योग्य नाही. यापुढे कोणीही अशा प्रकार बोलू नये, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
राज्यपालांच्याविधानावर आम्ही सर्वानी तात्काळ प्रतिक्रिया दिल्या होत्या. मी तर २४ तासाच्या आत त्यावर ट्वीटही केले, नंतर मला माझी भूमिका स्पष्ट करायची होती तीही सांगितली. परंतु, माझं पुन्हा पुन्हा सर्वांना सांगणं आहे की, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि असे गरज नसलेले प्रश्न निर्माण करतो. हे थांबवलं पाहिजे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की, मला आता माझ्या राज्यात परत जायचे आहे. मग ते काही कारण आहे की काय हेही कळायला मार्ग नाही. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं लंगडं समर्थ करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारे वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्र ते खपवूनही घेणार नाही, असे अजित पवार म्हणाले होते.