राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्यातच काल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला होता. या आव्हानांवर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले पाटील?
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या आव्हानांवर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आदित्य ठाकरेंचा वरळीत दारूण पराभव करेल. त्यासाठी एकनाथ शिंदे यांची गरज नाही. एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू कारण तुम्ही हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून सत्येसाठी ज्या पद्धतीने तीन वर्षात उलाढाली केल्या. त्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कुठल्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडलेल्या नाहीत. अशी टीका त्या आव्हानांवर पाटील यांनी केली आहे.
काय दिले होते आदित्य ठाकरेंनी आव्हान?
मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा. मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले होते.