दोन आठवड्यांपूर्वी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. आता त्याच सभेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने त्याच ठिकाणी आज जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याच सभेत बोलताना शिवसेना शिंदे गट नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
खेडमधील सभेत बोलताना रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब असंही म्हणाले होते की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, तेव्हा शिवसेना नावाचं दुकान मी बंद करून टाकेन. बोला उद्धवजी. तुमची सभा केवढी झाली. ही सभा केवढी आहे हे तुम्ही गपचूप लपून बघत असाल. अशी टीका त्यांनी ठाकरेंच्या सभेवर केली. त्या भास्कर जाधवचे कुणी चमचे असतील इथे तर त्यांना म्हणावं जाऊन बघा, सगळी ट्रॅफिक बंद आहे. इथल्यापेक्षाही चार पटीनं लोक बाहेर थांबलेत. शिवाजी पार्कपण कमी पडलं असतं. असे देखील ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात ना? मग तुमच्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही का केलीत? त्यांच्या विचारांशी गद्दारी का केली? २००९मध्ये तुम्ही मला गुहागरमधून तिकीट दिलं. पण तिथून तुमच्याच एका माणसाला तिथे नेमून तुम्ही मला पाडलंत. कारण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. या भास्कर जाधवची काय औकात होती मला पाडायची. असे १०० जाधव खिशात घेऊन फिरतो. असा निशाणा त्यांनी ठाकरेंवर आणि भास्कर जाधवांवर साधला.
दापोलीत योगेश कदमला पाडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे, मला तुम्ही ४ वर्षं भेटला नाहीत. मी तुमचे काय घोडे मारले ते एकदा सांगा ना तुम्ही. मलाही कळू द्या. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे गेल्यानंतर पक्ष संकटात आला, तेव्हा वर्षभर मला गाडीत बसवल्याशिवाय तुम्ही मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. मी गोळी झेलेन पण तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही हे मी शिवसेनाप्रमुखांना सांगत होतो. याची परतफेड केलीत का? असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला. फक्त योगेश कदमला कसं संपवायचं. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते, कटात नव्हतात. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढं होता हलवायला. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे. अशी खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.