राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नव्या वर्षात भाजपने मिशन लोकसभाची सुरुवात औरंगाबादपासून करण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच येत्या २ जानेवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची जाहीर सभा, पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादेत होणार आहे. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी ही माहिती दिली. त्यावरच आता शिवसेना ठाकरे गट नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खैरे?
२०१९ च्या निवडणुकीत काही लोकांच्या गद्दारीमुळे शिवसेनेचा पराभव झाला होता, पण आता ती चूक पुन्हा होणार नाही. त्यामुळे भाजपने कितीही जोर लावला, आतापासून तयारी केली, तरी या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार. लोकसभेच्या तयारीसाठी नड्डांची सभा होणार असल्याची माहिती मला आत्ताच कळाली. हरकत नाही, त्यांना सभा घेवू द्या. असे खैरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मी तर म्हणतो नड्डाच काय, मोदींनीही सभा घेतली तरी इथली हिंदुत्ववादी जनता उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. गेल्यावेळी झालेल्या पराभवामुळे जर कुणाला वाटत असेल की आता पुन्हा इथे शिवसेनेला विजय मिळवता येणार नाही, तर तो त्यांचा भ्रम आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असलेला आणि कायम भगव्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेला हा बालेकिल्ला आहे. तो आम्ही पून्हा खेचून आणू.
भाजपने कितीही शक्ती लावली तरी खरे हिंदुत्ववादी कोण? आणि ढोंगी कोण? हे जनतेला चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यांना किती सभा, बैठका घ्यायच्या त्या घेवू द्या, आम्हाला फरक पडणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यावर, शहरावर तुम्हाला पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकलेला दिसेल, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी यावेळी व्यक्त केला.