जळगाव : हिंदु जनआक्रोश मोर्चावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. खरंतर भाजपमध्ये मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे कडवट नेते असताना लव्ह जिहाद होत असेल तर हे सरकारचं अपयश आहे, अशी टीका राऊतांनी केली होती. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावं लागेल, असा मिश्कील टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
संजय राऊत यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावं लागेल. संजय राऊत यांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूसारखा कोणता तरी बिंदू आल्याने त्यांना हिंदुत्व विरोधी दिसत आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेने हिंदुत्वाची फारकत घेतली आहे. त्यांना आता हिंदुत्व या शब्दाची ॲलर्जी झाली आहे. नैराश्यातून ते अशाप्रकारे वक्तव्य करत आहेत, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
काय म्हणाले होते?
ती भाजपचीच रॅली होती. तो काही हिंदू जनआक्रोश वगैरे नव्हता. लोकांचा असा गैरसमज आहे की तो मोदींच्या विरोधातील आक्रोश होता. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. खरंतर भाजपमध्ये मोदी शहा फडणवीस यांच्या सारखे कडवट नेते असताना लव्ह जिहाद होत असेल तर हे योग्य नाही. हे सरकारचं अपयश आहे. त्यामुळे ते बहुधा न्याय मागण्यासाठी ते बाळासाहेब ठाकरेंसमोर आले असावे, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला होता.